आ.शिवेंद्रसिंहराजे भोसलेराजकीय
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांची मेढा येथे भव्य प्रचार सभा
विकासकामं करणं चांगलं का एजंटगिरी चांगली ? शिवेंद्रराजेंचा सवाल;

स्टार ११ महाराष्ट्र ——-
सातारा.दि.०८. असंख्य विकासकामे करून संपूर्ण जावली तालुक्याचा कायापालट केला आहे. कामे करण्यासाठी ठेकेदार लागणारच. ठेकेदार काय माझे पाहुणे, नातेवाईक नाहीत. ज्यांनी कोयना पुनर्वसनमधील गोरगरीब लोकांना मिळालेल्या जमिनी कवडीमोल किमतीत बिल्डर्सच्या घशात घातल्या आणि त्यातून कमिशन खाल्ले अशी कमिशन एजंटगिरी चांगली का विकासकामं करणं चांगलं? याचा विचार जावलीकरांनी करावा. गोरगरीब जनतेच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या या एजंटला जावलीकरांनी जावलीचा हिसका दाखवावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

वसंतगड, मेढा येथे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी खा. नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादीचे राजेंद्र लवंगारे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, ह.भ.प. सुहास गिरी, माजी सभापती जयश्री गिरी,प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, ऍड.शिवाजीराव मर्ढेकर, शिवसेनेचे एकनाथ ओंबळे,कांचन साळुंखे,पांडुरंग जवळ,दत्तात्रय पवार सागर धनावडे,जयदीप शिंदे,शिवाजी देशमुख, प्रशांत तरडे,एकनाथ रोकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जावली तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधींची कामे झाली आहेत. प्रत्येक काम दर्जेदार करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना त्या- त्या वेळी केलेल्या आहेत. त्यामुळे विरोधी उमेदवाराने बेंबीच्या देठापासून कितीही ओरड केली तरी त्याच्या भूलथापांना जनता कदापि भुलणार नाही. जावली तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना कोयना पुनर्वनमधून ठाणे, रायगड आदी ठिकाणी जमिनी मिळाल्या. त्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घालून स्वतःचे खिशे भरणाऱ्या कमिशन एजंटने गोरगरीब जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे आणि हा एजंट आता राजकारणात उतरला आहे हि दुर्दैवी बाब आहे. या बोगस शिवसैनिकाने हातात मशाल घेतली असली तरी तो २३ तारखेचा निकाल लागला कि शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार आहे. त्यामुळे खऱ्या, निष्ठावंत शिवसैनिकांनाही त्याच्यावर विश्वास नाही. हे पार्सल आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादीकडे परत पाठवायचे आहे. सर्व जावलीकरांनी मला मताधिक्याने विजयी करावे आणि भामट्या एजंटला चांगला हिसका दाखवावा, असे ते म्हणाले.
खा. नितीन पाटील, मानकुमरे, अशोक गायकवाड, रांजणे आदींनी आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. ऍड. मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. विकास देशपांडे यांनी आभार मानले. सभेला जावली तालुक्यातील महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ, माता- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.