
स्टार ११ महाराष्ट्र न्युज —– अजित जगताप
सातारा दि.२८. सर्व सामान्य गरिबांना आरोग्याची सुविधा मिळावी. यासाठी सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय या ठिकाणी अनेक गरजू रुग्ण व नातेवाईक यांची वर्दळ असते. परंतु सध्या सातारा येथील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा आजारी पडल्याने सामान्य रुग्णांना उपचारासाठी इतर खाजगी सिटीस्कॅनचा वापर करावा लागत आहे.साताऱ्यात शासकीय पातळीवर दिसाड बैठकांचे प्लान पण शासकीय रुग्णालयातील दुरुस्त होईना सिटीस्कॅन अशी साताऱ्याची अवस्था झाली आहे.
याबाबत माहिती अशी की सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षांपूर्वी सिटीस्कॅन यंत्रणा बसवण्यात आली होती. परंतु तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कराडकर जागरूक नागरिक यांच्या प्रयत्नामुळे ही सिटीस्कॅन यंत्रणा कराडला हलवण्यात आली. त्यानंतर सदरची स्थितीत सिटीस्कॅन यंत्रणा सातारा शहरात तीन कोटी रुपये खर्च करून बसवण्यात आली. सुरुवातीला सुमारे सहा हजार रुग्णांनी याचा वापर केल्यानंतर ही यंत्रणा बंद पडण्यामध्येच धन्यता मानू लागली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. डी. मारुलकर, डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. श्रीकांत भोई ,डॉ. अमोल गडीकर या जिल्हा शल्य चिकित्सक नंतर आलेले डॉ. युवराज करपे यांच्या काळातही क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन बंद होण्यामध्ये खंड पडलेला नाही.याच महिन्यात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे व २५ अधिकारी वर्गाने शासकीय रुग्णालयात तळमजल्यावर जाऊन रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पत्रकारांनी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे प्रश्न विचारले पण, काही प्रश्नांना आपण उत्तर देण्यास बांधील नाही. अशा शब्दात पालकमंत्री देसाई यांनी लोकशाही मार्गाने झालेल्या पत्रकार परिषदेत नकार घंटा वाजवली. आता सध्या सिटीस्कॅन यंत्रणा बंद पडल्यामुळे सातारवासीयांना सिटीस्कॅन काढण्यासाठी खाजगी यंत्रणाकडे धाव घ्यावी लागत आहे. तीन ते पाच हजार रुपये खर्च करून गरजू सिटीस्कॅन करावे लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना याची कल्पना दिली असून सिटीस्कॅन यंत्र लवकर सुरू व्हावी. अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करू लागलेले आहेत. सध्या गतिमान सरकार अशी जाहिरात बाजी करणाऱ्या या राज्य सरकारच्या कारभाराबाबत बोलाची कढी व बोलाचा भात हे मात्र आता सातारवासीयांना पटू लागलेले आहे. तातडीने उपचार झाल्यानंतर रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होते. पण ,आता शासकीय रुग्णालयात उपचार करणारी यंत्रणा बिघडू लागल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनी कुणाकडे पाहावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
आतापर्यंत या सिटीस्कॅनच्या दुरुस्तीसाठी सुमारे वीस लाख इतका खर्च आल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर सातार पाठोपाठ कराड उपजिल्हा रुग्णालयातील मशीन बंद असून आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे लोकांना पहावे लागत आहे. वास्तविक पाहता सातारा शासकीय रुग्णालयाचा वापर हा फक्त शासकीय पातळीवर वैद्यकीय प्रमाणपत्र व अनेक आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपींच्या औषध पाण्यासाठीच उपयुक्त ठरेल . असा कारभार सुरू आहे.काही खासदार आमदारांना सत्तेत असल्यामुळे आवाज उठवता येत नाही. तर काहींना मौन धारण करण्यामध्येच धन्यता मानावी लागत आहे. सध्या सिटीस्कॅन दिवाळीनंतर सुरू होईल का ? असा प्रश्न रुग्णांना पडलेला असून सातत्याने सिटीस्कॅन यंत्रणा बंद पडत असल्याने खाजगी व्यवसायिकांना सिटीस्कॅनच्याद्वारे चांगली कमाई होत असल्याने त्यांना अच्छे दिन आल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, लवकरच या विरोधात सातारा शहरातून आवाज उठवला पाहिजे यासाठी जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेणार असल्याचे समजले आहे.
विविध रोगाचे निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या चाचण्यांच्या मशीनचा औषध श्रेणीत समावेश करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या चाचण्यांचे दरही आवाक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या एप्रिल २०२० पासून याची अंमलबजावणी होणार असून केंद्राने त्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. पण, सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणात बंद असल्याने चाचणीचे दर आवाक्यात येण्याचे सांगणे म्हणजे उलट्या बोंबा ठरलेल्या आहेत.
—————————————–