
स्टार ११ महाराष्ट्र —-
नागपूर.दि.३०. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या अपघात प्रकरणी अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही उच्चस्तरिय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे विधान केले आहे.
नागपूरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल मी सकाळी 8.15 वाजेदरम्यान बारामतीमध्ये होतो. तर दृश्यमानता पूर्णपणे स्पष्ट होती. दिलेल्या माहितीनुसार 3 हजार मीटरपर्यंत दृश्यमानता स्पष्ट होती. 3 हजार मीटर म्हणजे 3 किलोमीटर अंतर होते. 3 किलोमीटरपर्यंत दृश्यमानता स्पष्ट होती तर अडचण आहे, असे मला वाटत नाही. यासंदर्भात नक्कीच उच्चस्तरिय चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. हा विमान अपघात आहे की घातपात आहे? यासंदर्भात सोशल मीडिया पाहिले तर हा घातपात आहे, अपघात नाही, असे 80 टक्के लोकांचे मत आहे.
तर सरकारने आपली बाजू स्वच्छ आहे, हे सिद्ध करण्यासाठी यासंदर्भात संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. कोणत्याही प्रकारची सर्वोच्च चौकशी सरकारने करावी. लोकांच्या मनामध्ये जो काही कलह आहे, तो सरकारने दूर करावा. सीआयडी चौकशी करून फार काही निष्पन्न होणार नाही, सीबीआय चौकशी करावी किंवा उच्चस्तरिय न्यायालयीन चौकशी व्हावी. दुसरीकडे बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? असा प्रश्न शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.



