
स्टार ११ महाराष्ट्र
पाचगणी प्रतिनिधी —
पांचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ आणि चोरीला गेलेले ४ लाख रुपये किमतीचे विविध कंपण्यांचे २५ मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले आहेत. मोबाइल चोरीबाबत कारवाई करीत मोबाईल मूळ मालकांना परत मिळवून दिल्याबद्दल पांचगणी पोलिसांचे कौतुक होत आहे.
पांचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रहीवासी व पर्यटकांचे मोबाईल गहाळ होणेचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व वाई उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम या वरीष्ठांचे आदेशाने त्या गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस, अंमलदार यांनी पांचगणी पोलीस ठाण्यात गहाळ मोबाईलचा तपास हाती घेतला होता.
पांचगणी पोलीस ठाणे दाखल, गहाळ मधील मोबाईल फोनचे बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्ह्यातून शोध घेवुन एकुण ४,००,०००/- रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण २५ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यास सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले असुन नमुद फोन नागरीकांना परत करणेत आलेले आहेत.
पांचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सायबर तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी या शोध मोहिमेत सहभाग घेतला आहे.
पांचगणी या पर्यटन नगरीत स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांचे बाजारपेठेतून , पर्यटन स्थळावरून तसेच कॉलेज तरूणांचे प्रवासात मोबाईल चोरी किंवा गहाळ होण्याच्या घटना वाढत आहेत. मागच्यावेळी जवळपास २० मोबाईल परत आहे. आजही २५ मोबाईल परत केले आहेत यासाठी पोलीस प्रचंड मेहनत घेत आहेत. नागरिकांनीही अशी घटना होऊ नये यासाठी सतर्क राहावे आणि झाल्यास पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
दिलीप पवार पोलीस निरीक्षक, पांचगणी पोलीस ठाणे