महाराष्ट्रसातारा
विकास कामे वेळेत व गुणवत्तापुर्ण होण्यासाठी तसेच कामांचे संनियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी नवीन तयार केलेली इ प्रणाली उपयुक्त
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा दि.5. जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची अद्यावत प्रगतीची तसेच पूर्ण झालेली कामे ही ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व वेळेत झाली असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुणवत्तापूर्ण काम सनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली विकास कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहूउद्देशिय सभागृहात बांधकाम स्वरुपाच्या कामावर संनियत्रण ठेवण्यासाठीच्या ई प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता श्री. अहिरे, व श्री मोदी, टेकएसपी सोल्युशन्सचे सचिन खराडे आदी उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण काम सनियंत्रण प्रणाली (वर्क क्वालिटी मॉनिटरींग सिस्टीम) ही चांगली असून जिल्ह्याच्या विकासासाठी या प्रणालीची मदत होणार असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, जिल्ह्यात होणाऱ्या सर्व विभागाकडील सर्वच विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करुन गुणवत्तेची शहानिशा करणे प्रशासनाला तसेच विभागप्रमुखांना शक्य नसते. विकास कामे ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे गुणवत्तापूर्ण व वेळेत होणे सोपे व्हावे यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली पोर्टल व ॲपद्वारे चालणार असून केंव्हाही कामाची तपासणी करणे याप्रणालीद्वारे शक्य होणार आहे. यात मंजूर काम कोणत्या वर्षातील आहे, कामाची रक्कम, त्यांच्या प्रशासकीय मान्यता आहे की नाही, काम सुरु करण्यासाठी आदेश केंव्हा निर्गमित करण्यात आली आहे. करण्यात येणाऱ्या कामांची प्रगती व्हीडीओ व छायाचित्रासह उपलब्ध होणार असून करण्यात येणाऱ्या कामांच्याबाबतीत येणाऱ्या समस्या तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणेही सोईचे होणार आहे. होणारी विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार असून कामांसाठी चा मंजूर निधीही शंभर टक्के खर्च होण्यास मदत होणार असल्याची खात्रीही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली. या प्रणालीच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेने ही एक चांगली व उपयुक्त प्रणाली विकसित करण्यात आल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, वेगवेगळ्या विभागाची कामे होत असताना काम चांगले होण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पाठपुरावा होत असतो. काम पूर्ण झाल्यानंतर कामाबाबत तक्रारी प्राप्त होतात, कामे समाधानकारक न झाल्याने शासनाचे झालेले नुकसान भरुन काढता येत नाही. यासाठी कामे गुणवत्तापुरक होऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्रणालीचा अत्यंत चांगल्या पध्दतीने वापर होईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी व्यक्त केला.
यावेळी टेकएसपी सोल्युशन्सचे सचिन खराडे यांनी उपस्थित अभियंत्यांना गुणवत्तापूर्ण काम सनियंत्रण प्रणाली (वर्क क्वालिटी मॉनिटरींग सिस्टीम) बाबत प्रशिक्षणाद्वारे माहिती देऊन उपस्थितांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हापरिषदेसह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे उपभियंते, शाखा अभियंते, कनिष्ठ अंभियंते, क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.
000