
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——–
सातारा दि. 25 : भारतीय हवामान विभागाकडून सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी रेड अलर्ट अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा देण्यात येईल अशावेळी पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषत: पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यामध्ये तसेच उर्वरित तालुक्यामधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन/ दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. अशा गावांमधील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी हि संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी दिले.

सदर बाबीमध्ये हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ झाल्याचे निदर्शनास आलेस संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. वेळोवेळी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्हयात रेड अलर्ट व ऑरेन्ज अलर्ट घोषीत करण्यात येतात. या कालावधीत जिल्हयात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत होते व नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.

तसेच पश्चिम भागातील तालुक्यामध्ये संभाव्य भूस्खलन / दरडी कोसळून जिवित हानीचा धोका निर्माण होतो. सदर धोका टाळणेसाठी तेथील नागरिकांना विहित वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन आवश्यक त्या सोई-सुविधा व निवाऱ्याची व्यवस्था तातडीने करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित तालुक्याचे तहसिलदार, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी सदर धोकादायक दरडग्रस्त व भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावांना भेटी देवून तेथील नागरिकांना विहित वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वरील आदेश निर्गमित केले आहेत.
00000000