श्रीमंत मुधोजी महाविद्यालयात राज्यस्तरीय पाचव्या मराठी एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन

स्टार११ महाराष्ट्र – एस पवार
कुडाळ.०७ छत्रपती संभाजी महाराज लढवय्ये होते पण त्याचबरोबर ते साहित्यिकही होते . त्यांचे हे साहित्य अभ्यासकांच्या अलीकडेच लक्षात आल्यामुळे ते जनमानसांत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा छोट्या छोट्या संमेलनाची आवश्यकता आहे. या संमेलनामुळे ग्रामीण भागातील साहित्यिकांना प्रकाशात येण्याची संधी मिळणार आहे. तसेच राजभाषा मराठी ला न्याय देण्याची भूमिका असल्याचे सांगत त्यांनी ग्रामीण भागातील साहित्यिकांनी सकस लेखन करत पुढे यावे असे आवाहन केले.संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

मुधोजी महाविद्यालय फलटण पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि अॅग्रो न्युज परिवार चॅरीटेबल ट्रस्ट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय पाचव्या मराठी एक दिवशीय साहित्य संमेलनाचे आयोजन महाविद्यालयात श्रीमंत मुधोजी विचार मंचवर करण्यात आले होते. याचे उद्घाटन आ. दीपक राव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख हे होते.
संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव देशमुख यांनी सांगितले की साहित्य जनमानसात पोहोचविणे ही या संमेलना मागची भूमिका आहे. संगणक युगातही पुस्तकांचा खप वाढतो आहे याचा अर्थ वाचक वाढत आहेत. त्यामुळे साहित्यनिर्मिती ला वाव आहे. साहित्य संमेलने मराठी भाषेच्या जीवनाच्या अविभाज्य भाग आहे. त्यामध्ये संतांनी महाराष्ट्राला दिलेली सांस्कृतिक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. साहित्यात सतत बदल होत असतो, होत आहे, काळानुरूप ते बदलत असते. सर्व विषयांवर साहित्य निर्माण होत आहे आजच्या प्रमाणे पूर्वीचे लेखक ,साहित्यिक यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना चरितार्थासाठी दुसरे काही काम करावे लागत होते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्याची ओळख नवीन पिढीला होणे आवश्यक आहे आणि तो या संमेलनाच्या आयोजनामागचा हेतू आहे.
उद्घाटनाच्या सत्रामध्ये श्रीयुत जगन्नाथ शिंदे तसेच सौ कुसुम जगन्नाथ शिंदे यांना ‘धर्मवीर संभाजी महाराज उत्कृष्ट साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तर सौ. उज्वला रणजीत निंबाळकर यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी विशेष साहित्य सेवा पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार, कविता संग्रह, कथासंग्रह, आत्मकथन, कादंबरी समीक्षण व संशोधन ललित लेख आदींना प्रदान करण्यात आले. तसेच संमेलना निमित्तआयोजित केलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी धर्मवीर स्मरणिका, कथासंग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह यांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम यांनी प्रास्ताविकामध्ये या साहित्य संमेलन आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. पूर्वाध्यक्ष कथाकथनकार प्रा.रवींद्र कोकरे यांनी संमेलनाची सूत्रे प्रा.विश्वासराव देशमुख यांच्याकडे सुपूर्त केले. संमेलनाचे निमंत्रक प्रा. डॉ.प्रभाकर पवार यांनी उपस्थितांचा परिचय करून स्वागत केले.
यावेळी नाशिकचे ज्येष्ठ कवी बाळासाहेब गिरी, कोल्हापूरचे प्रा.डॉ. प्रकाश दुकळे, भोजराज निंबाळकर, रमनलाल दोशी,सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. अॅग्रोन्युज परिवार चॅरीटेबल ट्रस्ट, फलटणचे अध्यक्ष प्रकाश सस्ते हे या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक होते, . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. सौ. नीलम देशमुख व दत्ता जानकर यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रगट मुलाखत, कथाकथन, कविसंमेलन अशा बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मुधोजी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व अॅग्रोन्युज परिवार टिमने परिश्रम घेतले. प्रा.डॉ.अनिल टिके, प्रा.महादेव गुंजवटे, प्रा.गणेश नांदले, प्रा. विजय काकडे,पुरस्कार प्राप्त मान्यवर व साहित्य रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



