महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

राज्यातील २७ लाख नागरिकांना लाभ देणारा ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्री
एकाच ठिकाणी मिळणार विविध योजनांचे लाभ

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —-

  मुंबई, दि. १४. आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५  हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

             “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची” असे हे  अभियान असून त्याचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे.

कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ

             जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. कित्येक वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही. यावर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण इत्यादी ठिकाणी “जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ नावाचा अभिनव व पथदर्शी उपक्रम  राबविण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे.

एकाच छताखाली विविध विभाग

             या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाची पूर्वतयारी १५ एप्रिल २०२३ ते १५ मे, २०२३ या कालावधीत  करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यींची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येतील.

            प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान ७५ हजार लाभार्थ्यींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. लाभार्थ्यींना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!