महाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

नवी दिल्ली, १७ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने  गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले.  याप्रसंगी  केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, तसेच केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध श्रेणीत प्रथम आलेल्या राज्यांना, शहरांना, महानगर पालिकांना, नगर पालिकांना, ग्राम पंचायतींना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित  करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे  पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला.  हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.

मलकापूर नगर परिषदेतील 24X7 नळ पाणी पुरवठा ठरला पथदर्शी प्रकल्प

मलकापूर नगरपरिषदेने वर्ष 2009 पासून 24X7 नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. सलग 15 वर्षे अखंडितपणे हि योजना सुरु आहे. यामुळे मलकापूर शहरातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. 24X7 नळ पाणी पुरवठा योजनेस वर्ष 2011 चा नॅशनल अर्बन वॉटर ॲवार्ड व पंतप्रधान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

ही योजना देशभरातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरली आहे. 24 तास पाणी मीटरव्दारे देण्यात येते. यामध्ये जे स्थान‍िक नागरीक दर महिण्याच्या 15 तारखेच्या आत पाणी पट्टी कर भरतात त्यांना 10 टक्के सवलत दिली जात असल्याने 90 टक्के लोग पाणी पट्टी कर भरतात, अशी माहिती उपनगराध्यक्ष श्री शिंदे यांनी दिली.

24X7 नळ पाणी पुरवठा योजनेसाठी कोयना नदीच्या पात्रातून जॅकवेल मधून रॉ-वॉटर घेऊन त्याच्यावर 24X7 फिल्टर प्लांटद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते. डी आय व एचडीपीई बंद नलिकेद्वारे एएमआर मीटरचा वापर करुन संपुर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो.

मलकापूर नगरपरिषद 24X7 नळ पाणी पुरवठा योजने बरोबरच मलकापूर नगरपरिषदेने सांडपाणी प्रक्रिया योजना राबविली आहे. या अंतर्गत पाण्याचा पुर्नवापर अतिशय नियोजनबद्दरित्या केला जात आहे. हे पुर्नवापर केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येत आहे.मलकापूर नगर परिषदेच्या  एकूण कार्याचा गौरव आज राजधानी दिल्लीत करण्यात आला.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!