
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज —— संदिप गाडवे
केळघर, दि.:२९: उत्तर कोरेगाव मधील नायगाव येथे कळपाने फिरणाऱ्या रान डुक्करानी ज्वारीचे उभे पिक उध्वस्त केले असून जोमात असलेले ज्वारीचे पीक मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अगोदरच उत्तर कोरेगाव मध्ये दुष्काळाचे संकट असताना शेतकऱ्यांनी कशीतरी ज्वारीची पेरणी केली होती. ज्वारीचे पीक चांगले उगवून आलेले होते. मात्र रात्रीच्या वेळेस कळपाने फिरणाऱ्या रान डुक्करानी ज्वारीचे पीक खावून फस्त केलें आहे.
नायगाव मधील शेतकऱ्यांचे यामुळे मोठें नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळेस कळपाने रान डुक्करे फिरतात. त्यामुळे ज्वारीची राखण करण्यास शेतकरी धजवत नाहीत. रात्रीच्या वेळेस ही रान डुकरे शेतकऱ्यावर हल्ला करण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. रान डुकरे मोठें नुकसान करत असताना देखील वन विभागाने बघ्याची भुमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी वन विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नायगाव येथील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने वन विभागाने तातडीने नुकसानीत शेतीची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी अन्यथा वन विभागाच्या विरुद्ध उत्तर कोरेगाव मधील शेतकरी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नायगाव चे सरपंच नितीन धुमाळ यांनी दिला आहे.