नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा -महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

Star11maharashtra news
सातारा.दि.०५. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यत जलद पोहोचवून नागरीकांचे जीवन सुखकर बनविण्यासाठी ऑनलाईन सेवा देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यासाठी सर्व सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा, असे आवाहन महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांसोबत राईट टू सर्व्हीस अंमलबजावणी आणि ऑनलाईन सेवा पुरविणाऱ्या केंद्र चालकांच्या क्षेत्रीय कामकाजाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, जावळी (मेढा) तहसीलदार श्री. कोळेकर आदी उपस्थित होते.
शासनाकडील सेवा मिळवणे हा नागरीकांचा अधिकार झाला असून त्या सेवा अधिसुचित होऊन लवकर मिळण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध झाल्या पाहिजेत हा शासनाचा मानस आहे, असे सांगून श्री. काटकर म्हणाले, शासनाने 15 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले आहेत, नागरिकांच्या समस्या सोडवू शकलो तरच नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी पारदर्शी, सकारात्मक वातावरण होईल. ऑनलाईन सेवा देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यात येणार आहे. इंटरनेटसह पायाभूत सूविधा देण्यात येणार आहे. क्षमता बांधणीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सेवाकेंद्राच्या कर्मचाऱ्यांना उपयोगी असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने तरतूदही केली आहे, असेही ते म्हणाले.
या बैठकीत शासकीय कार्यालय प्रमुखांसह, शासनाच्या विविध ऑनलाईन सेवा पुरविणाऱ्या केंद्रचालक यांनी ऑनलाईन सेवेतील येणाऱ्या अडचणी मांडल्या