केळघर. दि.०२ जावली तालुक्यातील केळघर विभागातील केळघर,व बाजूच्या परिसरात खैराच्या झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे.
कात भट्टीच्या व्यवसायासाठी खैर लाकडाची मोठ्या प्रमाणवर आवश्यकता असल्याने त्याची तोड वाढली आहे. या खैरांना चांगला दर असल्याने शेतकरी आपल्या शेतातील खैर विक्रीला प्राधान्य देत आहेत.
गेल्या काही वर्षात तालुक्यात खैर वृक्षाची बेसुमार तोड झाली आहे. वन विभाग या तोडीकडे लक्ष देत नसल्याने खैर वृक्ष नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. खैर वृक्ष बारीक पानांचा असून, लहान काटे, काळसर सालीचा व १५ फूट उंचीचा असतो. पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी शोषून घेणारा हा वृक्ष थंडीच्या हंगामात तजेलदार असतो. खैर ही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देणारी वनस्पती. याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. पूर्वी खैराची तोड या भागात मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, आता गावपातळीवरील ग्रामस्थांच्या जागृतीमुळे खैराची तोड कमी प्रमाणात होत असली तरी मधल्या काळात झालेल्या तोडीमुळे या भागातील खैर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
केळघर विभागातील रहदारीच्या व आतील भागातून याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते.खैर या जातीच्या झाडाची अशीच तोड होत राहिल्यास ते दुर्मिळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.काही ठिकाणी या खैर झाडाचे मोठे ढीग दिसून येत आहेत. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष दिसून येते.
खैर व्यापाऱ्याकडून अल्पदरात शेतकऱ्यांकडून खैराच्या झाडांची खरेदी करून त्या झाडांचा मोठया प्रमाणावर कात तयार करणाऱ्या व्यापाऱ्यांना विक्री केली जाते या बेसुमार चाललेल्या खैराच्या तोडिकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचेही येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे भर पावसाळ्यात पडीक जमिनीत खैर लागवड करुन दुर्मीळ होत चाललेला हा वृक्ष संवर्धित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा अनेक प्रकारच्या वृक्ष तोडींवर वनप्रेमींनी चिंता व्यक्त केलीआहे.




