डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 54 लाभार्थ्यांना
22 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान वाटप
स्टार ११ महाराष्ट्र न्युज —-
सातारा दि. 12 :अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात सातारा जिल्ह्यातील 54 लाभार्थींना 22 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे.
राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, शेततळ्याच्या प्लॉस्टीक अस्तीकरणासाठी 1 लाख, जुनी विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरींग व पंपसंचासाठी प्रत्येकी 20 हजार, वीज जोडणी आकार 10 हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन पंप अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी 25 हजार रुपये या मार्यादेत अनुदान वितरीत करण्यात येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजना पॅकेज स्वरुपात राबविली जाते. यामध्ये विहिर पॅकेजमध्ये नवीन विहिर जोडणी आकार, विद्युत पंपसंच, तुषार किंवा ठिबक संच असे 3 लाख 5 हजार ते 3 लाख 30 हजार रुपये देण्यात येतात. जुनी विहिर दुरस्ती पॅकेजमध्ये जुनी विहिर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंपसंच असे एकूण 1 लाख 5 हजार ते 1 लाख 30 हजार रुपये व शेततळ्याचे प्लॉस्टीक अस्तीकरण, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंपसंच असे एकूण 1 लाख 55 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये लाभाचा समावेश आहे.
0000



