सामाजिक

जावळीकर जनतेने भविष्याचा विचार करावा,व्यसनमुक्त युवक संघटना आपला लढा सुरूच ठेवणार

जावळीतील जनतेला विनम्र आवाहन….. विलासबाबा जवळ

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

       मेढा.दि.१२. ऐतिहासिक जावळी तालुक्यातील महिला रणरागिनींनी संपूर्ण देशात ईतिहास घडवित पहिला दारू दुकानमुक्त तालुका करण्यात यश मिळविले.असा नावलौकिक प्राप्त होवून आता १५ वर्षे पूर्ण झाली. ही जरी आनंदाची बाब असली तरीही गावागावातील मूठभर अवैध दारू विक्रेत्यांमुळे त्यांना मिळत असलेल्या अनेक खात्यांच्या व गावटग्यांच्या पाठबळामुळे दारूबंदी मोडीत काढण्याचे काम होताना दिसत आहे.


सुरवातीच्या काळात थोडे दिवस अनेक गावातील महिलांनी यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला पण घरातील कर्त्या पुरूषांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत घरचे खावून लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उद्योग सोडण्याचा सल्ला दिला. हातावर पोट असणार्‍या महिलां वारंवार यासाठी लढू शकत नव्हत्या तरीही व्यसनमुक्त युवक संघटना मात्र गेली १५ वर्षे सातत्याने हा लढा देत आहे.


१५ वर्षापुर्वी या तालुक्यात १३ दारूची दुकाने होती. दारूबंदी झाली नसती तर कदाचित या दुकानांची संख्या आता १३० च्या वर गेली असती. एकट्या कोरेगाव शहरात दारूची दुकाने ३५ ते ४० दुकाने आहेत.कधी कोरेगावला गेला तर पहा रस्त्यावर पडणारांची संख्या किती आहे. दारूबंदी पुर्वी मेढा, कुडाळ, आनेवाडी, केळघर या बाजारपेठांच्या गावात रस्त्यावर पडणारांची संख्या किती होती व दारूबंदी नंतर पडणारांची संख्या किती आहे याचे परिक्षण होणे गरजेचे आहे. त्यावेळी शाळा-काॅलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांना चहाच्या हाॅटेल सारखी खुलेआम दारूची दुकाने दिसत होती आज ती दिसत नाहीत याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत आहेच ना?
अवैध दारू विक्रेत्यांची लाॅबी वाढताना दिसत आहे ही नक्कीच चिंतेची बाब आहे. पण गावात असणारे दोन-चार अवैध दारू विक्रेते गावाला भारी आहेत का? आपल्यावर नसती आफत नको म्हणून सामांन्यांकडून त्यांना विरोध होत नाही आणि आपल्याला काय करायचे म्हणून प्रतिष्ठीत पुढे येत नाहीत. तालुक्यातील काही प्रतिष्ठीतांनी एखाद्या दिवशी आवाज उठविला पण तो तिथेच हवेत विरून गेला. व्यसनमुक्त युवक संघाने मात्र यावर वारंवार आवाज उठविण्याचे काम सुरू ठेवलेले आहे.


दारूबंदीची चळवळ सुरू झाल्यापासून काही बुध्दीजीवी अर्थतज्ञ दारूबंदी मुळे बाजारपेठा ओस पडल्याचे सांगतात.पण जावळीत रोजगाराच्या संधी नसल्याने अनेक कुटुंबे शहराकडे स्थलांतरीत झाली त्याचा उहापोह करीत नाहीत. या लोकांनी कधीतरी दारूतून उध्वस्थ झालेल्यांच्या घरात जावून विधवा पत्नीशी व लेकरांशी संवाद साधावा म्हणजे अतीदारू पिणारा माणूस घरात काय आणतो ते कळेल. सरकारच्या महसुलाची चिंता करणारे महाभाग अवैध दारूविक्री मुळे महसुल बुडाल्याचा कांगावा करतात पण अवैध येणारी दारू सुध्दा वैध दुकानातून महसुल देवूनच येते हे मात्र विसरतात. दारू पिणारे थांबलेत का? असे प्रश्न विचारणारे लोक स्वतः लायसन्स घेवून दारू विक्री करण्यासाठी उतावळे झालेत का असा प्रश्न पडतो. हेच लोकं दारूबंदी वाल्यांनी किती जणांची दारू सोडविली? किती प्रबोधन केले? असले प्रश्न विचारून समाजाची दिशाभूल करीत आहेत. चोविस तास नशेत असणारी लोकं आज पूर्ण व्यसनमुक्त झाली आहेत याची संख्या शेकडोंच्या घरात आहे.ज्या युवकांनी या संघटनेशी जोडून घेतलेले आहे त्यांची सर्व कुटुंबे व्यसनमुक्त आहेत पण काविळ झालेल्यांना जग पिवळेच दिसते ना? अवैध दारू विक्रीमुळे अनेक युवक वाममार्गाला लागल्याची चिंता व्यक्त करणारे दारू सुरू झाल्यावर बारमध्ये जावून युवक सुधारतील याची खात्री देतील का? पर्यटकांच्या दारूची चिंता करणारे जावळीतील सामान्य जनता उध्वस्थ होईल याची चिंता करतील का?
व्यसनमुक्त युवक संघाने किंवा दारूबंदी करणारांनी काय केले ते विचारायचे आणि दुसर्‍याबाजुला प्रसिध्दीसाठी स्टंट आहे, स्वतःच नाव मोठ करण्यासाठी आंदोलन आहे असेही म्हणायचे. छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते दुसर्‍याच्या घरात अशीच भूमिका निनावी पोस्ट करणार्‍या बिनउद्योगी लोकांची आहे.


कोणत्याही पोस्टला उत्तर देण्याची तशी गरज नाही. कारण व्यसनमुक्त युवक संघटनेने केलेले कार्य समाजासमोर आहे. कोणत्याही स्वार्था शिवाय अनेक वेळा जीव धोक्यात घालून रात्री अपरात्री केलेल्या कारवाया व आंदोलने समाजासमोर आहेत आणि समाज सुज्ञ आहे याचा विचार नक्कीच करेल!
जावळी तालुक्यातील दारूबंदी उठविण्यासाठी काही ठिकाणी प्रमुख लोक एकत्र येत आहेत पण अवैध धंद्यांविरोधात व जावळी तालुक्यातील विविध प्रश्नावर हीच लोक कधी एकत्र आली का याचा जनतेने विचार करावा.
जावळी तालुक्यातील सर्व सन्मानिय सरपंच,उपसरपंच, सदस्य यांनी भावी पिढीच्या उज्वल भविष्याचा विचार करून दारू दुकाने चालू करण्यासाठी कसलेही ठराव देवू नयेत.ज्या गावातून असे ठराव न कळत जातील अशा ठिकाणी लोक उठाव करतील याची खात्री आहे.


व्यसनाधिन झालेले लोक कदाचित सुधारणार नाहीत पण भावी पिढी व्यसनाधिन होवू नये एवढीच माफक अपेक्षा.
गेली २५ वर्षे व्यसनमुक्त युवक संघाने वसा घेतला आहे व्यसनमुक्तीचा, प्रबोधनाचा आणि राष्ट्रकार्याचा तो सुरूच रहाणार.ज्यांचा बाप दारूच्या व्यसनात गेला त्यांना विचारा, त्या वेदना काय आहेत. सोन्याचा चमचा तोंडात घेवून श्रीमंतांच्या घरात जन्म घेणार्‍यांना व बापाच्या पैशावर उड्या मारणारांना या व्यथा समजणार नाहीत. कारण त्यांनी ही दुखः कधी पाहिलेली नसतात.


दारू दुकानांची लायसन्स स्वतःसाठी किंवा आपल्या नातलगांना व बगलबच्चांना मिळवून देण्यासाठी आतुर झालेले लोक, काही विघ्नसंतोषी आणि व्यसनी लोकांना हताशी धरून दारूबंदी चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.जावळीकर जनतेने भविष्याचा विचार करावा त्यांना नक्की काय हवे.
व्यसनमुक्त युवक संघटनाआपला लढा सुरूच ठेवणार आहे येतील त्यांच्या सोबत न येतील त्यांच्या शिवाय लढा गतिमान होणारच.

विलासबाबा जवळ व्यसनमुक्त संघ महाराष्ट्र राज्य

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!