
सातारा दि.२०. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग , विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक सचांलक संतोष जाधव यांनी केले आहे.
या योजनेकरिता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतीवर्षी रू. ४३ हजार व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतीवर्षी ३८ हजार लाभाचे वितरण केले जाणार आहे.
या योजनेंर्तगत २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षाकरिता व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० ,तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० अशा एकुण ४५० विद्यार्थ्याची लाभाकरिता निवड केली जाणार आहे. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांनाही त्यांच्या प्रवेश प्रकिया पूर्ण झाल्यावर याचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिनांक १५ जुलै २०२४ पर्यंत ऑफलाइन पध्दतीने अर्ज दाखल करावेत.