आ.शिवेंद्रसिंहराजे भोसलेसातारा
बेपत्ता झालेल्या महिला, मुलींचा शोध तत्काळ घ्या
आ. शिवेंद्रसिंहराजे; पोलीस अधीक्षकांना केले आवाहन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
सातारा.दि.२०. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. वृत्तपत्रांमध्ये दररोज मुली अथवा महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत असतात. मिळालेल्या महितीनुसार आज अखेर आपल्या सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता झाल्या असल्याचे समजत आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. बेपत्ता महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा तत्काळ शोध घ्यावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केले आहे.
यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पोलीस अधीक्षक शेख यांना निवेदन दिले आहे. मुली, महिला बेपत्ता होणे यामुळे संबंधितांचे आई- वडील, कुटुंब, नातेवाईक यांच्यासह समाजमानवर त्याचे विपरीत परिणाम होत असतात. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
काही दिवसांपूर्वी किल्ले अजिंक्यतारा परिसरात एका मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला होता. सदर मुलगी सुध्दा २ महिन्यांपासून बेपत्ता होती, अशी माहिती वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती. दोन महिने बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडतो पण, तिचा शोध लागत नाही ही बाब गंभीर आहे.
बेपत्ता मुली अथवा महिलांची नोंद त्या- त्या पोलीस ठाण्यामध्ये होत असते मात्र त्यांचा शोध का लागत नाही? संबंधीत मुली, महिलांचा शोध तत्काळ लागल्यास त्यांचा जीव वाचू शकतो अथवा पुढील अनर्थ, अनुचित प्रकार टाळला जाऊ शकतो. त्यामुळे बेपत्ता मुली अथवा महिला यांचा शोध लावणे यासाठी पाठपुरावा करणे हे काम संबंधीत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आहे. याबाबत संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात. बेपत्ता झालेल्या मुली, महिलांचा तत्काळ शोध घेण्यात यावा आणि मुली, महिला बेपत्ता होणे अशा घटनांना आळा बसणेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पोलीस अधीक्षक शेख याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.